गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग८८

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -88-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248     

                  


*अहमदनगर जिल्ह्यातील अद्भूत निसर्ग सौंदर्य लाभलेल्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गाव हे तिचे माहेर आणि सासरही.अकोले तालुक्यातील लोक अतिशय निसर्गप्रेमी,प्रचंड कलासक्त,शेतीवर भरभरून प्रेम करणारे.हे गुण लहानपणी तिच्याही अंगी होते.लोकांना येणारे विविध आजार हे रासायनिक शेती आणि हायब्रीड वानांमुळे तर येत नसावे असा विचार तिच्या मनात येतो.आणि मग सुरू होतो विषमुक्त शेती करण्याचा सर्वाना थक्क करणारा प्रवास.याला ती इतकी वाहून घेते की देशी अस्सल 52 पिकांचे 114 वाण तिच्याकडे साठवले जातात. पुढे बायफ या संस्थेच्या माध्यमातून कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून देशी बियाणांची बचत बँक स्थापन करते.ती स्त्री म्हणजे भारताची  सीड मदर,बीजमाता पदमश्री राहीबाई पोपेरे*.                             


राहीबाई यांच्या या जगावेगळ्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा पदमश्री हा किताब देऊन सन्मान केला आहे. त्याचबरोबर त्यांना बी.बी.सी शंभर प्रभावशाली महिला, नारीशक्ती पुरस्कार ही मिळाले आहे.जगातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय  बियाणे कंपनी  कडे नाहीत असे गावठी वाण राहीबाई यांच्याकडे उपलब्ध आहेत.नुसते वालाचे 20 प्रकार त्यांच्याकडे आहेत.गावठी पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या,वांगी,भेंडी,पालक,मेथी,आंबा,यारखे अनेक गावठी वाण त्यांच्या सीड बँकेत आहेत.म्हणूनच महान शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना दिलेली 'सीड मदर' ही उपाधी सार्थ ठरते.त्यांच्या शेजारील बागेत शेकडो झाडे लावून त्यांची नावेही सहज सांगणाऱ्या राहीबाई यांचे कोणतेही औपचारिक शिक्षण नाही.पण त्या शिक्षित माणसाला ही आपल्या अफाट ज्ञानाने विचार करायला भाग पाडतात.गावठी वाणाचे संरक्षण व संवर्धन करणे यासाठीच जणूं त्यांनी आपले आयुष्य वाहून घेतले आहे.या बिया त्या मडक्यात जतन करून ठेवतात.    


   *गावरान वाण शोधणे, त्यांची लागवड करणे,त्यांच्या बिया काढणे,त्या संकलित करणे,त्या इतरांना पेरणीसाठी देणे,त्यांना प्रेरणा देऊन बियांचे संकलन करणे ही मोठी प्रक्रिया करण्यासाठी राहीबाई यांनी तीन हजार पेक्षा अधिक महिलांचा बचत गट तयार केला आहे.हे सगळे करताना  कुटुंब ,बायफ संस्था, कोंभाळणे ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे सांगायला त्या विसरत नाही.सुरवातीला त्यांनी गावठी वाण जमा करण्याचे  काम सुरू केले तेव्हा फक्त त्या एकटया होत्या,पण त्या थांबल्या नाहीत.त्यांचे जीवन आपल्याला हेच सांगत रहाते सगळे शिक्षण पुस्तकात मिळत नाही,काही अनुभवाच्या शाळेतच शिकावे लागते.आणि त्यासाठीही  अफाट मेहनत करावी लागते.कष्ट उपसावे लागतात.मग यश पहाण्यासाठी लोकांची रांग लागते*.


Comments

  1. आमच्या गावच्या आहेत. आम्हाला अभिमान आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०