गोष्टी जिद्दी माणसांच्या- भाग114
*📝*गोष्टी जिद्दी माणसांच्या*
*पर्व -2 -नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -14-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*जालना जिल्ह्यात भोकरदन मधील देहेड येथे त्याचा जन्म 3 मार्च 1951 मध्ये झाला.घरातील परिस्थिती अत्यंत गरिबीची.घरात तो सर्वात लहान.त्याच्या काळात इतरांप्रमाणे शिक्षणाच्या अनंत अडचणी.पण त्याची शिकण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही.तो मुलगा लाकूडतोड,कपबश्या धुणे,मंदिरात सफाई करणे,अगदी पुस्तकांच्या दुकानातही काम करतो,पण शिक्षण थांबवत नाही.तो मुलगा प्रचंड अभ्यास करून इंटरसायन्स परीक्षा पास होतो.नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेवून एम.बी.बी.एस करतो.आपल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक संशोधने करतो.याच संशोधनातून तो मुलगा विंचू दंशावरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी औषध काढतो.आणि अनेक लोकांचे जीव वाचवतो ही असामान्य कामगिरी करणारा तो मुलगा म्हणजे पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर*.
*डॉक्टरांना त्यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारचा पद्मश्री,लायन्स क्लब इंटरनॅशनल,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,इंडीयन मेडिकल असोसिएशन या सर्वांकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड,मराठवाडा भूषण, बुलढाणा जिल्हा गौरव यासारखे अनेक पुरस्कार मिळाले.रायगड जिल्ह्यातील महाड मधील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला लागल्यावर कोकणात विंचूदंश होवून मृत्यूचे प्रमाण पाहून त्यांचे मन अस्वस्थ होते.विषारी विंचूदंश झाला की हृदय कमकुवत होते फुफ्फुसात पाणी भरते श्वास घेता येत नाही,यामुळे मृत्यू येतो.डॉक्टर यावर औषध शोधायचे ठरवतात.मग सुरू होतो त्यावर औषध शोधण्याचा यज्ञ.विंचूदंश झालेल्या रुग्णापाशी डॉक्टर तीन तीन रात्र बसून निरीक्षण करत,यातून त्यांनी नोंदविलेली निरीक्षणे हाफकिन संस्थेला पाठवली.51प्रकरणावर अभ्यास करून शोधनिबंध तयार केला.अनेक वेळा संशोधन करून डॉक्टरांनी सोडियम नायत्रोप्रसाइड, व नंतर प्राझोसिन नावाचे प्रभावी औषध विंचू दंशावर शोधून काढले.त्यामुळे विंचूदंश मृत्यचे प्रमाण 40 टक्क्याहून एक टक्क्यावर आले.त्यांच्या या लाशीचा फायदा कोकणचं नाही तर विंचूदंशाचे प्रमाण अधिक असणाऱ्या कर्नाटक,आंध्रप्रदेश,गुजरात,पाँडिचेरी यांनाही झाला*.
*ग्रामीण भागात काम करून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर ही त्यांची ओळख.तीन तास प्रॅक्टिस चार तास वाचन हे यशाचे गमक डॉक्टर सांगतात.सर्पदंश,हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोग यावरही त्यांनी संशोधन केले.व्याख्याने,प्रशिक्षण,कार्यशाळा यातून त्यांनी समाजाला आरोग्याच्या बाबतीत अधिक शिक्षित केले.विषारी विंचवाच्या नांगी पुढे नांगी टाकणाऱ्या लोकांना नावे आयुष्य देणारे डॉक्टर खरेखुरे देवदूतच.पायाशी लाखो रुपये लोळण घेत असताना आपले वैद्यकीय ज्ञान ग्रामीण भागतील लोकांसाठी वापरणारे डॉक्टर आपल्याला जणू हेच सांगतात तुमचे आयुष्य खडतर असते तेव्हा त्याचा उपयोग संधी म्हणून करा.काळाच्या कसोटीवर जे टिकतात तेच अजरामर ठरतात*.

Comments
Post a Comment